
- महावितरणच्या हलगर्जीपणामुळे गरीब शेतकऱ्याला आर्थिक फटका
नुकसान ग्रस्त शेतकऱ्याने केली मदतीची मागणी
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर येथील छल्लानी नगर २ लगत असलेल्या लेआउट परिसरात शनिवारी (दि. २४ मे) दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या पोलाला स्पर्श झाल्याने एका गर्भवती म्हशीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत गरीब शेतकरी अब्दुल रफिक यांचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झालेआहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल रफिक हे नांदगाव खंडेश्वर शहरातील चांदपुरा येथील रहिवासी असून त्यांच्या मालकीची म्हैस नेहमीप्रमाणे चारा खाण्यासाठी बाजूच्या छल्लानी लेआउटच्या परिसरातील मोकळ्या भूखंडावर गेली होती. याच दरम्यान, चारा खात असताना म्हैसचा विद्युत पोलला स्पर्श झाला आणि ती जागीच कोसळून मृत्यूमुखी पडली. विशेष म्हणजे ही म्हैस आठ महिन्यांची गर्भवती होती. या म्हशीच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरी कोणतीही उदरनिर्वाहाचे साधन नाही. त्यामुळे आपल्या उदरनिर्वाच्या साधनावर महावितरणच्या हलगर्जी पुन्हा मुळे घाला पडला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
माझी म्हैस ही किमान १ लाख रुपयांची होती. ती गाभण होती, त्यामुळे दुहेरी नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीने यासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि मला नुकसान भरपाई द्यावी.
अब्दुल रफीक
शेतकरी तथा म्हैस मालक, चादपुरा,नांदगाव खंडेश्वर*
मानवहानी टळली – मात्र धोका कायम
सदर परिसरात दररोज लहान मुले क्रिकेट खेळतात. या पोलाच्या संपर्कात ही मुले आली असती तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने ही घटना जनावरापुरती मर्यादित राहिली. मात्र यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेमुळे नागरिकांत महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध तीव्र संतापाची लाट उसळली आहे या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महावितरणच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढले असून सदर परिसरातील विद्युत व्यवस्था तातडीने तपासून योग्य ती दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.