वर्षभर सामाजिक-वैचारिक उपक्रम राबविण्याचा संकल्प
वलगांव (अमरावती) / प्रतिनिधी
स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, समाजप्रबोधन आणि मानवसेवेचा अखंड संदेश देणारे थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांची १५० वी जयंती वलगांव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम वलगांव येथील श्री गाडगे महाराज वृध्दाश्रम येथे आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी गाडगे बाबांच्या स्मारकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गाडगे बाबांनी आयुष्यभर स्वच्छतेचा आणि समतेचा दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असून समाजाने तो आचरणात आणण्याची गरज असल्याचे यावेळी वक्त्यांनी अधोरेखित केले.

मिशनचे चेअरमन श्री. मधुसूदन मोहीते पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “गाडगे बाबांची १५० वी जयंती साजरी करणे ही केवळ एक औपचारिक बाब नसून त्यांच्या विचारांचे संवर्धन आणि समाजहिताचे कार्य सातत्याने राबविणे, हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल.” श्री गाडगे महाराज मिशन मुंबई मार्फत वर्षभर विविध सामाजिक आणि वैचारिक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यामध्ये स्वच्छता अभियान, शैक्षणिक मदत, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, व्यसनमुक्ती जनजागृती, पर्यावरण संवर्धन तसेच युवकांसाठी प्रबोधनपर व्याख्यानमाला यांचा समावेश असणार आहे.कार्यक्रमादरम्यान मिशनचे सचिव श्री. सचिन राजारामबाप्पू घोंगटे यांना भूगोल विषयात आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करताना वक्त्यांनी सांगितले की, सामाजिक कार्यासोबत शैक्षणिक प्रगती साधणे हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.जयंतीनिमित्त वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना मिष्ठान्न भोजन देऊन त्यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. ज्येष्ठांनी गाडगे बाबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याची महती सांगितली. कार्यक्रमामुळे वृध्दाश्रमात आनंददायी आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.या प्रसंगी मिशनचे चेअरमन श्री. मधुसूदन मोहीते पाटील, सचिव श्री. सचिन घोंगटे, खजिनदार श्री. ज्ञानदेव महाकाळ, वलगांव संस्थेचे संचालक श्री. कैलास बोरसे, पूर्ण बोरसे यांच्यासह वृध्दाश्रमातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.गाडगे बाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाने त्यांच्या विचारांची नव्याने उजळणी करून समाजात सेवा, समता आणि स्वच्छतेचा संदेश दृढ करण्याचे कार्य केले.
