वाहतुकीस अडथळा, अपघातांचा धोका वाढला.
अधिकारी तालुक्याचा कारभार चालवित आहेत बडनेरा वरून
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
यवतमाळ-अमरावती मुख्य मार्गावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडे झुडपांमुळे वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण झाला आहे.रस्त्याच्या कडेला वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे दोनचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी या झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकल्यामुळे वाहनांची हालचाल धोकादायक बनली आहे.हा मार्ग अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असून दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी आणि कामगार या मार्गावरून प्रवास करतात. मात्र आता या झुडपांमुळे रस्त्याची दृश्यता कमी झाली असून अपघातांची शक्यता वाढली आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून जाताना समोरील वाहन दिसणे कठीण जाते दोनचाकी वाहनचालकांना समोरून येणाऱ्या प्रकाशामुळे अडथळा निर्माण होतो आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमुळे तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता वाढते.

या रस्त्यालगत काही भाग जंगल परिसराला लागून आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी हरणे,ससे आणि इतर वन्यप्राणी रस्त्यावर येत असल्याच्या घटना अनेकदा दिसून आल्या आहेत. झुडपांमुळे हे प्राणी अचानक रस्त्यावर धावत आल्याने वाहनचालकांना ब्रेक लावण्यास वेळ न मिळता अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.या महत्वपूर्ण समस्येकडे सार्वजनिक बांधकाम यांचे हेतूपुरस्सर दुर्लक्ष होत असून ते फक्त उंटावरून शेळ्या हाकत आहेत ते कधीही नांदगाव खंडेश्वर येथे नागरिकांना दिसत नाहीत ते बडनेरा येथूनच नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा कारभार चालवित आहेत त्यामुळे या तालुक्यातील नागरिकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील झाडे झुडपांची तातडीने छाटणी करण्यात यावी, अशी मागणी त्रस्त नागरिकानी केली आहे. तसेच रस्त्यावर योग्य प्रकारे परावर्तक फलक (reflectors) व चेतावणी चिन्हे बसविण्यात यावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर अपघातांचा धोका अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
