
कळमजापुरच्या शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना सवाल…
भिलटेक – कळमजापुरच्या रस्त्याची दयनीय अवस्था
चांदूर रेल्वे / तालुका प्रतिनिधी
चांदूर रेल्वे तालुक्यातील भिलटेक – कळमजापुरच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. अशातच कळमजापुर जवळ या रस्त्यालगत कालव्याचे कामे झाले असतांना त्याठिकाणचा रस्ता पुर्णत: खराब झाला असुन पायी चालणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे या रस्त्याने जायचे कसे ? असा सवाल आता कळमजापुरचे शेतकरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारत आहे. भिलटेक ते कळमजापुर हा डांबरी रस्ता अतिशय खराब झाला असुन अनेक ठिकाणावरून रस्ता उखडला आहे. तसेच या रस्त्यालगत एका कालव्याचे काम काही महिण्यांपुर्वी झाले.
कालवा बनविला त्याठिकाणच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असुन मोठ्या प्रमाणात मातीसुध्दा रस्तावर जमली आहे. त्यामुळे आता पावसाळ्यात भर रस्त्याच्या मधात चिखल निर्माण झाला असुन आता पायी चालणेही कठीन झाले आहे. त्यामुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होत आहे. सद्यास शेतात पेरणी, फवारणीचे कामे सुरू असुन शेतकऱ्यांना दररोज शेतात जावे लागत आहे. मात्र या रस्त्यामुळे शेतकऱ्यांची पंचाईत होत असुन याठिकाणावरून जातांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.