
३० तारखेच्या आत लाभार्थ्यांनी धान्य घ्यावे – पुरवठा विभागाचे आदेश
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
पावसाळा अगदी जवळच आला असताना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासादायक पुरवठा विभागाचे वतीने दिलासादायक बातमी आहे की, शासनाच्या निर्देशानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे रेशन एकत्रितपणे जून महिन्यातच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य पोहोचविण्याचे आणि वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे.पुरामुळे दरवर्षी बाधित होणाऱ्या गावांमध्ये रेशन पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी शासनाकडून ही विशेष योजना राबवली जात आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात एकूण १५६ गावे नदीकाठावर असून त्यातील ३० ते ३५ गावे दरवर्षी पूरस्थितीचा सामना करतात. अशा वेळी रस्ते बंद होऊन मुख्यालयाशी संपर्क तुटतो आणि नागरिकांना आठवडाभर गावातच अडकून पडावे लागते. काहींना सुरक्षित स्थळी हलवावे लागते. हे लक्षात घेऊन धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून तीन महिन्यांचे रेशन आगाऊ देण्याचा निर्णय झाला आहे.
*पूरबाधित गावांना प्राधान्य.*
या योजनेनुसार सर्वप्रथम पूरप्रवण गावांमध्ये रेशन पोहोचवले जात आहे. अनेक गावांमध्ये आधीच धान्य पोहोचवले गेले असून काही ठिकाणी रेशन वाटपाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. यामुळे आपत्तीच्या वेळी होणारी तारांबळ मोठ्या प्रमाणात आता टळणार आहे.
*३० तारखेच्या आत रेशन घ्या अन्यथा मिळणार नाही*
पुरवठा विभागाकडून स्पष्ट आदेश देण्यात आला आहे की, लाभार्थ्यांनी आपले तीन महिन्यांचे रेशन ३० जूनच्या आत घेऊन जावे. एकदा अंतिम तारीख उलटली की त्या महिन्याचे रेशन पुन्हा देण्यात येणार नाही.
*तहसील कार्यालयात बैठक पार पडली.*
नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात झालेल्या पुरवठा विभागाच्या बैठकीत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे रेशन वेळेत वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर लाभार्थ्यांचे आधार लिंक, ई-केवायसी आणि मोबाईल नंबर सीडिंग यासाठीही मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तालुक्यातील सर्व पात्र राशन लाभार्थ्यांनी आपले रेशन तीस तारखेपुर्वी घेऊन जावे आणि पुढील आपत्तीपासून स्वतःची व कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करावी.
शितल राठोड
पुरवठा निरीक्षण अधिकारी, नांदगाव खंडेश्वर