
राष्ट्रहिताच्या विचारांनी नांदगाव खंडेश्वर ‘आयटीआय’मध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
शिवाजी महाराजांनी शिवराज्यभिषेक सोहळ्यानंतर राजाची सुत्रे सांभाळली. त्यांच्या अष्टप्रधान मंडळात सर्व जाती – धर्माची लोकं होती. शिवाजी महाराजांनी 350 किल्ले बांधले मात्र स्वत:साठी महल बांधले नाही. महाराजांनी प्रत्येक प्रजेचा विचार केला. महाराजांच्या काळात महिला सुरक्षित होत्या, शेतकऱ्यांच्या पिकाला कोणी हात सुध्दा लावायची हिंमत करीत नव्हता. शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी न्याय दिला. अनेक राजे होतील मात्र शिवाजी महाराजांसारखा राजा आता होणे नाही. महाराजांनी विज्ञानाचा उपयोग सुध्दा केला असे मत व्यक्त करीत प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे असे आवाहन साची फाउंडेशनचे अध्यक्ष तथा छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर एम. ए. शिक्षण प्राप्त केलेले गाढे अभ्यासक जगदिश गोवर्धन यांनी केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत ६ जून रोजी नांदगाव खंडेश्वर येथील एकनाथराव रानडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे राष्ट्रभक्तीच्या विषयावर आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात बोलत होते.
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडीओ संदेशाद्वारे या व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. सदर उपक्रम कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. स्थानिक आयटीआयमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य सुरेश मेंढे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जगदिश गोवर्धन, प्रमुख वक्ते अनिकेत कराळे, शिल्पनिदेशक राजेंद्र उन्होंणे, राजकुमार धोटे आदींची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात प्रशिक्षणार्थी लक्ष्मी अलोने हिने पोवाळा सादर करून झाली. तर वायरमनच्या प्रशिक्षणार्थी यांनी शिवाजी महाराजांवरील गीत गायन केले. यानंतर प्रशिक्षणार्थ्यांची भाषणे झाली. प्रमुख वक्ते अनिकेत कराळे यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांविषयी विस्तृत माहिती दिली तर प्राचार्य सुरेश मेंढे यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पनिदेशक रूपाली लांडे, संचालन शिल्पनिदेशक तुषार जैन व आभार प्रदर्शन राजेंद्र उन्होंणे यांनी केले. या दरम्यान रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा सुद्धा झाल्या. तसेच संस्था परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. याशिवाय नांदगाव खंडेश्वर शहरातून रॅली काढून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. तसेच खंडेश्वर मंदिर परिसरात व मुख्य चौकात स्वच्छता करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आयटीआयचे शिल्पनिदेशक तुषार जैन, वैभव जाधव, निलेश देऊळकर, राम इखार, शहजाद खान, सुशिल सरोदे, चिन्मय दहाट, सागर डांगे, वैभव केणे, प्रशांत पोच्ची, सचिन वाहणे, सचिन दुवधने, मयुरी वसुले, रूचिका डोरस, संगिता बिबेकर, दिपाली लोखंडे, रूपाली लांडे, कार्यालयीन कर्मचारी अनंत खेडकर, निलेश खंडार, मनोज पकडे, गौरव मोगरे, सुरक्षारक्षक धिरज तायडे यांच्यासह प्रशिक्षणार्थ्यांनी परिश्रम घेतले.