
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष नागरिकांच्या जिवाशी
खेळरस्त्यावर ठिकठिकाणी पडले खड्डे.
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर ते चांदूर रेल्वे दरम्यानचा मुख्य असलेला २६ किमीचा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून या रस्त्याला ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांचे जीवन वाहन चलविताना धोक्यात आले आहे. या रस्त्याचे अनेक ठिकाणी डांबर निघून गेले असल्याने रस्त्याची अवस्था इतकी अत्यंत वाईट झाली असल्याने वाहनचालकांना आपलं जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.राजुरा गावाच्या काही अंतरापर्यंत हा रस्ता कसाबसा चालण्याजोगा असला तरी त्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्यामुळे अपघाताचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. विशेषतः नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांना उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय, चांदूर रेल्वे येथे असल्याने कामानिमित्त वारंवार जावे चांदूर रेल्वेला जावे लागते.त्यामुळे कधी त्यांना रात्र सुद्धा होते परंतु रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने त्यांच्या प्रवासाला त्रासदायक आणि जीवघेणी ठरत आहे.
या रस्त्यावरून दोन चाकी वाहनाने जाणे म्हणजे थेट जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखे आहे. अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांना अनेकदा रस्ता सोडून बाजूच्या मोकळ्या जागेचा वापर करावा लागतो परंतु हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत अपुऱ्या स्थितीत आहे असल्याने नागरिकांना तारेवरची कसरतच करावी लागते.हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जणू वाडीतच टाकल्याची भावना नागरिकांची झालेली आहे कारण या रस्त्याकडे लक्ष द्यायला अधिकाऱ्यांना वेळच नाही.त्यामुळे या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष देऊन तातडीने या रस्त्याची डागडुजी व मजबुतीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा याविरुद्ध आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.जर प्रशासनाने याकडे वेळेवर लक्ष दिले नाही तर या मार्गावरील अपघाताचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.या समस्येकडे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्वरीत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या रत्यावर नांदगाव खंडेश्वर येथे बस स्थानक परिसरा पासून तर खंडेश्वर मंदिरापर्यंत मध्यभागी दुभाजक बसविण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे कारण या परिसरात नागरिक आणि मुले हे भरधाव वेगाने दुचाकी वाहने चालवीत असल्याने अपघात होण्याची शक्यता नेहमीच असते आणि दुकानदार यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून हा रस्ता निमुळता केल्याने वाहन चालविताना चागलीच कसरत करावी लागते त्यामुळे सा.बा.विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.