
पाऊस येण्याची आधी खबर देतात ‘हे’ पक्षी
पाऊसाचे संकेत देतात पक्षी
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
निसर्गाशी घट्ट नातं असलेल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना हवामानातील बदलांची पूर्वकल्पना पक्ष्यांच्या हालचालीतून मिळते. पावसाचा आगमन काळ जवळ आल्यावर काही पक्ष्यांचे वर्तन, आवाज, आणि हालचाली बदलतात, यावरून शेतकरी आणि निसर्गप्रेमी पावसाचे संकेत ओळखतात. हे निरीक्षण केवळ तात्पुरते नाही, तर अनेक पिढ्यांपासून चालत आलेली एक समृद्ध पारंपरिक ज्ञानसंपत्ती आहे.
ज्याप्रमाणे हवामान खातं आधुनिक तंत्रज्ञानाने पावसाचा अंदाज लावते, त्याचप्रमाणे निसर्गातले काही पक्षीही स्वतःच्या अंगी असलेल्या नैसर्गिक संवेदनेच्या आधारे पावसाच्या आगमनाची सूचना देतात. यामध्ये ‘पावशा’ हा पक्षी विशेष ओळखला जातो. ‘पेरते व्हा’ असा त्याचा आवाज ऐकू येऊ लागला, की शेतकरी मशागतीसाठी तयारी सुरू करतात. या पक्ष्याला ‘पर्जन्यदूत’ मानले जाते. त्याचा आवाज आणि वावरणं हे निसर्गात बदल घडत असल्याचं स्पष्ट लक्षण असतं.
त्याचप्रमाणे ‘नवरंग’ पक्षीही आपल्या खास आवाजाने पावसाच्या जवळ येण्याची माहिती देतो. निसर्ग निरीक्षक आणि पक्षी अभ्यासक सांगतात की, नवरंगचा आवाज ऐकू येऊ लागला की हवामानात बदल घडतो आहे हे निश्चित मानावं. शेतकऱ्यांनीही यावर अनेक वर्षे विश्वास ठेवला असून त्यांच्या अनुभवातून या पक्ष्यांच्या सवयींचं निरीक्षण अधिक बळकट झालं आहे.
‘तिबोटी खंडवा’, ‘निळ्या कानाचा खंडता’, ‘छोटा खंड्या’, हे पक्षीही मे महिन्यातच पावसाची चाहूल लावतात. हे पक्षी प्रामुख्याने जलाशयाजवळ किंवा ओल्या जागांमध्ये फिरू लागतात. यामुळे येणाऱ्या काळात पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे ‘पाणकोंबडी’ आणि ‘मोर’ हे पक्षीही पावसापूर्वी जोरात ओरडत असतात, जे देखील हवामानातील आर्द्रतेचा परिणाम असतो, असा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो.
‘कोकीळ’, ‘कावळा’ आणि ‘चिमणी’ हे पक्षी आपली वर्तनशैली बदलतात. कोकीळाचा मधुर स्वर, कावळ्यांचे टोळक्याने ओरडणे, चिमण्यांची अधिक सक्रिय हालचाल, यावरून वातावरणात बदल होत असल्याचे संकेत मिळतात. हे सगळे लक्षणे मिळून शेतकऱ्यांना अंदाज बांधता येतो की, लवकरच पाऊस येणार आहे.
‘तितुर’ हा आणखी एक महत्त्वाचा पक्षी आहे. अंगावर काळे-पांढरे ठिपके असलेला हा पक्षी ‘कोड्यान केको, कोड्यान केको’ अशा विशिष्ट स्वरात ओरडतो. याचा अर्थ पावसाचा काल जवळ आहे, असा संदेश मानला जातो. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, तितुरचा हा सांकेतिक आवाज फार विश्वासार्ह संकेत असतो.
सर्वात विलक्षण बाब म्हणजे आफ्रिकेतून येणारा ‘चातक’ पक्षी. हा पक्षी ‘पिऊ पिऊ’ असा आवाज करतो. शास्त्रज्ञ सांगतात की, चातक पक्षी आकाशात पडणाऱ्या पहिल्या थेंबाची वाट पाहतो. त्याचे हे वर्तन अनेक वर्षे नोंदवले गेले असून, त्याच्या आवाजावरूनही पावसाची चाहूल लागते.