आषाढीला पंढरपूर जाणाऱ्या मानाच्या पालख्यांची संख्या वाढवण्याची मागणी
विदर्भातून कौंडण्यपूरच्या एकाच पालखीला मान
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी)
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील वारीकरिता मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रती दिंडी वीस हजार रुपये अनुदान देण्यास शासनाने 16 जुलै 2025 रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे मान्यता प्रदान केली आहे. मात्र शासनाने ज्या दहा पालख्यांना मान्यता दिली आहे, त्या सूचीमध्ये विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांतून फक्त श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, श्रीक्षेत्र कौंडण्यपूर, जि.अमरावती ह्या केवळ एकाच तीर्थक्षेत्राचा समावेश केलेला आहे. अकरा जिल्ह्यांमधील वारकरी दिंडी-प्रमुखांना आपल्या हजारों सहकारी वारकऱ्यांसह दिंड्या घेऊन कौंडण्यपूरच्या मानाच्या पालखीसोबत पंढरपूरला जायचे आहे; अन्यथा हे अनुदान मिळणार नाही.शिवाय दिंड्यांना मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम नोंदणीकृत दिंड्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने मोठ्या संख्येने अकरा जिल्ह्यांतून दिंड्या जमा होईल. ह्या दिंड्यांचे नियोजन व्यवस्थित न झाल्यास गर्दी अनियंत्रित होईल व परिणामतः होणाऱ्या गैरसोयीमुळे वारकरी भक्तांचे अत्यंत वाईट हाल होतील. त्यासाठी विदर्भातील मानाच्या पालखीच्या संख्येत तातडीने वाढ करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कलावंत वारकरी सेवा विकास व सन्मान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्याम खंडारे ह्यांनी शासनाकडे विनंती केली आहे. सदर प्रश्नाबाबत यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. संजय राठोड, राज्यमंत्री मा.ना. इंद्रनील नाईक आणि वणीचे आमदार मा. संजय देरकर ह्यांनी सुद्धा समाज कल्याण मंत्रालयाला लेखी पत्राद्वारे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी, धामणगाव देव, आणि जगन्नाथबाबा वणी ह्या तीन तीर्थक्षेत्रांचा समावेश करून शासनाने ह्याची तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती अमरावती ज्येष्ठ कलावंत व साहित्यिक आधार संघाचे समन्वयक प्रमोद पोकळे यांचेसह विदर्भातील समस्त वारकरी बांधवांकडून केली जात आहे.
