
शेतकऱ्यांनी सोयाबीन व तुरीच्या पेरणीला सुरुवात
बळीराजा झाला उत्साहित.
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी चागलाच उत्साहित दिसून येत आहे.मागील गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण असून देखील पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग पेरणीसाठी प्रतीक्षेत होता. मात्र सध्या सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांना चाग्लाच वेग आला आहे यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात यावर्षी सोयाबीन आणि तुरीच्या पेरणीस सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांनी बैलजोडी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने शिवारात उतरून पेरणीला सुरुवात केली आहे. अचानक मोठ्या प्रमाणात पेरणी सुरू झाल्यामुळे काही बियाणांच्या किमतीत रातोरात लक्षणीय वाढ झाली आहे.मयूर आणि खंडेलवाल कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांच्या ३० किलोच्या पिशव्या २२०० रुपयांवरून थेट २६०० रुपयांवर पोहोचल्या आहेत.दरम्यान पेरणीसाठी अत्यावश्यक असलेल्या खतांचाही तुटवडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तसेच डीएपी खताची टंचाई निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना ते उपलब्ध होत नाही.त्यामुळे पर्याय म्हणून २०:२०:०:१३ हे मिश्र खत शेतकरी वापरत आहेत. यासोबतच झिंक,बोरॉन आणि सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) खतांचा वापर सोयाबीन पिकासाठी केला जात आहे.
शेतकऱ्यांनी यावर्षी वेळेत व योग्य पावसात पेरणी सुरू केली असून आपल्या शेतात यावर्षी चांगले उत्पादन यावे व त्याला योग्य बाजारभाव मिळावा अशी आशा बळीराजा व्यक्त करत आहे.मात्र खतांचा पुरवठा सुरळीत करणे आणि बियाण्यांच्या दरावर नियंत्रण ठेवणे ही प्रशासनासमोरील महत्त्वाची जबाबदारी ठरू शकते.ही महत्वाची बाब आहे.
👍👌