
नागरिकांनी आमदारांकडे केली,दुरुस्तीची मागणी
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर ते सावनेर,जामगाव दरम्यानचा रस्ता सध्या अतिशय दयनीय अवस्थेत असून नागरिकांना रोजच्या जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या कित्येक वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याची कोणतीही देखभाल अथवा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी आज या मार्गावरील रस्ता पूर्णपणे उखडलेला असून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
माहुली चोर हे गाव तालुक्यातील एक प्रमुख गाव मानले जाते. हे गाव अमरावती-यवतमाळ मुख्य मार्गालगत असून येथे आठवडी बाजार,दवाखाने,मेडिकल्स,मटन व दारू दुकाने असल्यामुळे आसपासच्या खेड्यांतील नागरिकांची ये-जा सातत्याने होत असते. त्यामध्ये सावनेर व जामगाव या गावांतील नागरिकांची संख्या विशेष असून या दोन्ही गावांना माहुली चोरशी जोडणारा रस्ता हा प्रमुख संपर्क मार्ग आहे.
सध्या या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्याच्या तोंडावर ही स्थिती अधिकच बिकट झाली आहे. अपघाताचा धोका वाढला असून रुग्णवाहिका आणि शालेय वाहनांनाही या मार्गाने येणे-जाणे कठीण झाले आहे.
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी येथील नागरिक अंकुश कोल्हे, अंकुश खांडेकर, आकाश अंबर्ते, चेतन दाते यांनी आमदार प्रताप अडसड यांना निवेदन दिले असून रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण किंवा सुलभ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
*नागरिकांचा सवाल – विकास फक्त घोषणांपुरता का?*
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.विकासाच्या गप्पा खूप होतात,पण आम्हाला रोजचा रस्ता द्या,’ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकानी दिली आहे
या मागणीची तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.