अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
नवरात्र म्हणजे फक्त देवीची पूजा नव्हे, तर स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा आणि तिच्या सामर्थ्याची आठवण करून देण्याचा पर्व आहे. नवरात्रीत वेगवेगळ्या रंगांच्या साड्या व पोशाखांनी महिलांनी उत्सवाला एक वेगळं सौंदर्य दिलं. काहींनी आपल्या भगिनींना अभिवादन करत नवरात्रीला सामाजिक बांधिलकीची छटा दिली, तर काहींनी लेख, कार्यक्रम व उपक्रमांतून समाजाला विचार करायला लावणारे संदेश दिले.या उत्सवात महिलांनी आपल्या नृत्यकला, संगीत, चित्रकला व विविध प्रतिभेचा आविष्कार करून नवरात्राची शोभा वाढवली. देवी दुर्गेच्या विविध रूपांचा अभिनय व दर्शन घडवताना एकच संदेश ठळकपणे उमटला“आम्ही महिला कुठेही कमी नाही. आम्हाला संधी मिळाल्यास आम्ही समाजाला दिशा देऊ शकतो.”यात पुरुषांचाही सहभाग लक्षणीय आहे. महिलांना मंच उपलब्ध करून देणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि समानतेने सोबत उभे राहणे हेही नवरात्र साजरे करण्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरतं आहे.परंतु, या सगळ्या आनंदसोहळ्यात एक वेदनादायक वास्तव देखील आहे. समाजात अजूनही विकृत प्रवृत्तीचे काही गट अस्तित्वात आहेत. आजची नवी पिढी—फक्त सात-आठ वर्षांच्या वयापासून—भरकटत चालली आहे. युवक-युवती चुकीच्या मार्गावर जाण्याच्या उदाहरणांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे.म्हणूनच फक्त नवरात्र साजरे करून थांबून चालणार नाही, तर या उत्सवातून मिळालेली शक्ती आणि विचार आपण समाजपरिवर्तनासाठी वापरायला हवी. प्रत्येक कार्य, प्रत्येक कार्यक्रमातून योग्य विचारधारा घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी महिलांनी उचलली पाहिजे. गटागटांनी, छोट्या स्तरावर का होईना, पण समाजाला योग्य वळणावर आणण्याची गरज आहे.कारण एखाद्याचं मन किंवा आयुष्य बिघडलं तरी त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर आणि शेवटी आपल्या घरांवर होतोच. म्हणूनच प्रत्येक महिला आज नवरात्रीच्या देवीसारखी उभी राहून समाजाला वाईट प्रवृत्तीं पासून वाचवण्याचे आणि पुढच्या पिढीला योग्य दिशा देण्याचे काम करेल, हीच खरी दुर्गा पूजा ठरेल.
सुचिता बर्वे, सामाजिक कार्यकर्त्या,अमरावती.
