
संचालक (संचालन) श्री सचिन तालेवार यांचे प्रतिपादन
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
वीज सेवा अखंडित देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याची कारणे शोधा,फिडरची लांबी जास्त असेल तर त्याची विभागणी करा,नविन डिटीसी लावा, नविन एबी स्विच लावा,तसेच वीज पुरवठा अखंडित रहावा यासाठी पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरवठा करता येईल त्यादृष्टिने कायमस्वरूपी नियोजन करा.तसेच आरडीएसएस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या वीज यंत्रणा सुधारणा आणि मजबूतीकरणाच्या कामांना गती द्या असे निर्देश संचालक (संचालन) श्री सचिन तालेवार यांनी दिले.
विद्युत भवन येथे आज झालेल्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता अशोक साळुंके,अधीक्षक अभियंता दिपक देवहाते,प्रविण दरोली,कार्यकारी अभियंता प्रशासन प्रदिप पुनसे,अमित शिवलकर,कार्यकारी अभियंते पारेषण,तसेच महावितरणच्या परिमंडळातील सर्व विभागीय कार्यकारी अभियंते आणि अमरावती जिल्ह्यातील उपविभागीय अभियंते उपस्थित होते.यावेळी संचालक (संचालन) यांनी फिडर निहाय झालेला वीज पुरवठा खंडिताचा आढावा घेतला.कार्यकारी अभियंता यांनी देखभाल दुरूस्तीच्या कामावर नियंत्रण ठेवावे . तसेच ग्राहकांची तक्रार होणार नाही यासाठी सक्षम अधिकारी यांच्या परवानगीने आणि वीज ग्राहकाला पुर्व सुचना देवूनच देखभाल दुरूस्तीसाठी वीज पुरवठा बंद करण्यात यावा,औद्योगिक ग्राहकाची भूमिका जिल्ह्याच्या विकासात महत्वाची आहे. औद्योगिक ग्राहकांसाठी विजेच्या महत्व लक्षात घेऊन त्यांना सुरळीत वीज सेवा देण्यासोबत त्यांच्या वीज सेवे विषयक अडचणी जाणून घ्या आणि त्यांच्या तक्रारी तत्परतेने सोडवा.
तसेच कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांनी प्रत्येक महिन्यातून एकदा जिल्ह्यातील उद्योजकांसोबत बैठक घेत पुढाकार घेऊन वीज पुरवठ्याशी संबंधित प्रश्न सोडविण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले तक्रार घेऊन येणाऱ्या ग्राहकांना सौजन्याची वागणूक द्या, ग्राहकांच्या नावात बदल करण्याची आणि नविन वीज जोडणीसाठी महावितरणने ग्राहकांसाठी ऑनलाईन व्यवस्थेची सोय केली आहे, त्यामुळे वीज जोडणीचे अर्ज प्रलंबित राहणार नाही आणि महावितरणच्या ऑनलाईन सेवेचा लाभ मिळावा यासाठी उपकार्यकारी अभियंताकडून प्रत्येक महिन्याला आढावा घेण्यात यावा.
यावेळी बोलतांना श्री तालेवार म्हणाले की,वीज
ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून महावितरणमध्ये अनेक धोरणात्मक बदल करण्यात आले आहे. त्यामुळे परिमंडळातील शेवटच्या कर्मचाऱ्यांना महावितरणची ध्येय धोरणे,तसेच मुख्य कार्यालयातील बैठकितील निर्देश,सुचना यांची माहिती देण्यासाठी, नियमित लाईनस्टाफ पर्यंत संवाद साधा असेही निर्देश त्यांनी दिले.