
दिवसा सुरू असणाऱ्या पथदिव्यांवर महावितरण करणार कारवाई
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
महावितरणकडून दिवसा सुरू असणाऱ्या तसेच अनधिकृतपणे वीज जोडलेल्या पथदिव्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.त्यासाठी परिमंडळातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत. वीजेचा अनाठायी वापर रोखण्यासाठी आणि विजेचा अपव्यय टाळण्यासाठी महावितरणकडून संबंधित विभागांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.अनेक ठिकाणी पथदिवे दिवसा देखील सर्रास सुरू ठेवले जात असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीजेचा अपव्यय होत आहे. तसेच काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती किंवा कंत्राटदारांकडून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता वीज जोडणी करण्यात आली आहे. यामुळे महावितरणच्या आर्थिक उत्पन्नावरही याचा परिणाम होत आहे.शिवाय पथदिवे रात्रदिवस सुरू राहत असल्याने अनाठाई महावितरणच्या यंत्रणेवर याचा भार पडत आहे.वीजेचा वापर योग्य नियोजनाने आणि जबाबदारीने व्हावा यासाठी प्रत्येक विभागाने त्यांच्या अखत्यारितील पथदिव्यांचे योग्य व्यवस्थापन करावे.जेणेकरून ते रात्री सुरू होतील आणि सकाळी बंद होतील.अनधिकृत वीज जोडण्या तात्काळ बंद करण्यात याव्यात आणि दिवसा पथदिवे सुरू ठेवणाऱ्या यंत्रणा तत्काळ दुरुस्त करण्यात याव्यात, अन्यथा कारवाई केली जाणार आहे. कारवाईमध्ये अनाधिकृत विजेचा वापर आढल्यास संबंधित विभागावर विद्युत कायदा २००३ नुसार वीजेचा अपव्यय आणि अनाधिकृत वापराबाबत कारवाई केली जाणार आहे, तसेच दिवसा सुरू असणाऱ्या पथदिव्याचे सर्व साहित्य महावितरणकडून जप्त करण्यात येणार आहे.वीजेचा अपव्यय टाळण्यासाठी ग्राहकांनी, सर्वसामान्य नागरिकांनी आणि संबंधित विभागाने देखील सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले आहे.