
सहसचिव पदी डॉ .ओमप्रकाश कुटेमाटे व सागर दुर्योधन यांची निवड
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे २५वे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन नुकतेच ५जून रोजी अमरावतीत संपन्न झाले .पक्षाचे राष्ट्रीय कौसिल सदस्य तथा जेष्ठ नेते कॉ. तुकाराम भस्मे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या एक दिवसीय अधिवेशनाचे उदघाटन राज्य सचिव सुभाष लांडे यांचे हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून आयटकचे राज्य सरचिटणीस कॉ . शाम काळे हे होते . उदघाटन सत्रानंतर जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातून दोनशेच्या वर पक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या प्रतिनिधी सत्रात विविध राजकीय, संघटनात्मक व आंदोलनात्मक अहवालावर चर्चा करून, शेतकरी, मजुर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला यांचे प्रश्नांवरील ठराव या दरम्यान पारित करण्यात आले .विशेषतः महाराष्ट्र सरकारने आणलेले जनविरोधी जनसुरक्षा विधेयक २०२४ मागे घेण्यात यावे , शेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्ज माफीसह शेतीमालास एम.एस.पी. चा कायदा लागु करण्यात यावा,यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला, केंद्र सरकारने कामगार विरोधी चार श्रम संहिता मागे घ्याव्यात तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी, कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात येत्या ९ जुलै२०२५ रोजी होणारा देशव्यापी संप यशस्वी करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला.
जिल्हा अधिवेशनात निवडण्यात आलेल्या कौंसिलला अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि नवीन कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची निवड तसेच २२ ते २४ जून दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनाकरिता प्रतिनिधिची निवड करण्यासाठी आज मंगळवार, दि .१०जून २०२५रोजी सतिश चौधरी यांचे अध्यक्षतेखाली येथील नमुना स्थित पक्ष कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी ४५ जणांच्या जिल्हा कौसिल अंतिम करुन १५ सदस्यांची कार्यकारिणी निवडण्यात आली . यामध्ये कॉ. सुनिल मेटकर यांची जिल्हा सचिवपदी तर डॉ .ओमप्रकाश कुटेमाटे व कॉ . सागर दुर्योधन तसेच कार्यालयीन सचिव म्हणून कॉ .जे.एम. कोठारी यांची पुढील तीन वर्षासाठी सहसचिवपदी निवड करण्यात आली . यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले .