
अनेक मान्यवरांनी केले मार्गदर्शन
चांदूर रेल्वे / तालुका प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत ६ जून रोजी चांदूर रेल्वे येथील डॉ. सी. व्ही. रमण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे राष्ट्रभक्तीच्या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडीओ संदेशाद्वारे या व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. सदर उपक्रम कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.
स्थानिक आयटीआयमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य निरंजन मुरादे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून तहसिलदार पुजा माटोडे, वक्ते सचिन होले, प्रमुख पाहुणे म्हणून संस्था व्यवस्थापन समिती सदस्य बाळासाहेब सोरगिवकर, उपकोषागार अधिकारी मोहन पाटील, सामाजिक कार्यकर्ते नंदा वाधवानी, निलेश भालेराव, प्राविण्य देशमुख, डॉ. वसंतराव खंडार, डॉ. सुषमाताई खंडार आदींची मंचावर उपस्थिती होती. यावेळी वक्त्यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांविषयी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एल.पी. दांदडे, सुत्रसंचालन शिल्पनिदेशक प्रमोद वारकड व आभार प्रदर्शन शिल्पनिदेशक प्रकाश ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आयटीआयचे शिल्पनिदेशक, कर्मचारीवृंद व प्रशिक्षणार्थ्यांनी परिश्रम घेतले.