
संविधानाच्या मूल्यांनुसार कार्य करणार-सरन्यायाधीश न्या. भूषण गवई
अमरावतीत सत्कार सोहळा संपन्न
अमरावती / उत्तम ब्राम्हणवाडे
देशात संविधान हेच सर्वश्रेष्ठ असून त्यामुळे समाजात आर्थिक, सामाजिक समानता येण्यास मदत होणार आहे. येत्या काळात वंचित घटकांच्या विकासासाठी संविधानाच्या मूल्यांनुसार कार्य करणार असल्याची ग्वाही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांचा अमरावती जिल्हा वकील संघातर्फे आज सत्कार सोहळा पी. आर. पोटे इंजिनिअरींग कॉलेजमधील स्वामी विवेकानंद सभागृहात पार पडला. यावेळी माजी सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रमणा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती प्रवीण पाटील, अमरावतीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, तसेच डॉ. कमलताई गवई, डॉ. तेजस्विनी गवई उपस्थित होते.
सरन्यायाधीश श्री. गवई म्हणाले, न्यायदानाचे कार्य करण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्याचे अभिवचन देऊन न्यायदानाच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. विविध खटल्यात न्याय देताना सामाजिक भान जपले आहे. न्यायाधीशांना न्याय देण्याचा अधिकार प्राप्त असताना ते आपले कार्य आहेत असे समजून कृती करणे अपेक्षित आहे. न्यायप्रक्रियेत न्यायदान हे सर्वात कठीण कार्य आहे. त्यामुळे न्यायदानाचे कार्य करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या विवेक बुद्धीने न्यायदानाचे कार्य करावे. न्यायदानाच्या प्रक्रियेत समाविष्ट असणाऱ्या प्रत्येकाने आपण संविधानाचे रक्षक आहोत ही बांधिलकी कायम राहावी, यासाठी प्रयत्न करावे. येत्या काळात प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल, असे न्यायदानाचे कार्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विशेष उपस्थितीमध्ये बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, बार कौन्सिल महाराष्ट्र अँन्ड गोवाचे सदस्य ॲड. पारिजात पांडे, अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुनील देशमुख, ग्रंथालय सचिव ॲड. विद्या मानके (काळे) उपस्थित होते.अमरावतीचे सुपुत्र असलेले सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांनी आपल्या कायदेशीर प्रवासाची सुरुवात अमरावतीतून केली होती. त्यांच्या या गौरवशाली वाटचालीचा सत्कार करण्यासाठी वकील संघाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. सुरुवातीला सरन्यायाधीश न्या. श्री. गवई यांची रक्ततुला करण्यात आली. यामध्ये २७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रमात सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.सरन्यायाधीश श्री. गवई यांच्या कारकीर्दीचा विविध मान्यवरांनी आढावा घेतला. ॲड. सुनील देशमुख यांनी प्रास्ताविक केले. ॲड. साहू चिखले आणि ॲड. परीक्षित गणोरकर यांनी सूत्रसंचलन केले. ॲड अमोल मुरळ यांनी आभार मानले.
👌👍