निसर्ग साखळीत हरवलेली कडी पुन्हा जोडली
संख्या वाढण्याची शक्यता
अमरावती / उत्तम ब्राम्हणवाडे
गेल्या अनेक वर्षांपासून उशिरा येणाऱ्या आणि अनियमित मान्सूनमुळे पर्यावरणातील महत्त्वाचे उभयचर प्राणी बेडूक नामशेष होण्याच्या वाटेवर होता. मात्र यंदा वेळेवर व दमदार पावसाचे आगमन झाल्यामुळे परिसरातील उरलेसुरले बेडूक पुन्हा सक्रिय झाले आहेत. शेतशिवारातील तळी, डबकी, नाले आणि तलावांतून त्यांच्या ‘डरांव-डरांव’ आवाजांनी निसर्ग जागवलेला जाणवू लागला आहे.यंदाचा अवकाळी पाऊस आणि मान्सूनपूर्व सरींमुळे संपूर्ण महाराष्ट्रात जलसंचय वाढला आहे. परिणामी, बेडकांच्या अधिवासातील पाणीस्रोत पुनः सक्रिय झाल्याने त्यांच्या जीवनचक्राला गती मिळाली आहे. ठिकठिकाणी साचलेले पाणी त्यांच्या प्रजननासाठी उपयुक्त ठरत असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगल्या उत्पादनाची आशा निर्माण झाली आहे. कीटक नियंत्रणात बेडकांचे योगदान बेडूक कीटकाहारी प्राणी असल्याने शेतीतील कीड नियंत्रणासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरतात, त्यामुळे कीटकनाशकांवर खर्च न करता निसर्गाच्या मदतीने कीड नियंत्रणाचा मार्ग खुला होतो. शिवाय, अन्नसाखळीतील संतुलन राखण्यासाठीही त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. 
‘शीतकालीन समाधी’ -एक नैसर्गिक वैशिष्ट्य
बेडूक शीतरक्तीय प्राणी असल्यामुळे तापमानातील बदलाशी जुळवून घेतात. हिवाळा व उन्हाळ्यात ते सुप्तावस्थेत राहतात. याला ‘शीतनिद्रा’ किंवा ‘शीतकालीन समाधी’ म्हणतात. या काळात त्यांचा चयापचय मंदावतो आणि ते त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतात. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यावर ते पुनः सक्रिय होतात.
संख्या रोडावण्यामागील कारणे
पूर्वी विज्ञान शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेडकांचे विच्छेदन केले जात होते. याशिवाय, गोवा व परदेशांतील खाद्यसंस्कृतीत बेडकांचे मांस अत्यंत लोकप्रिय होते. यामुळे बेडकांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. शिवाय, विहिरी व नैसर्गिक जलस्रोतांची संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवासांवरही संकट आले.
प्रयोगशाळेतील बंदी आणि कायदेशीर संरक्षण
२०११ पासून शैक्षणिक प्रयोगशाळांमध्ये बेडकांच्या विच्छेदनावर बंदी घालण्यात आली. पीपल्स फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स या संस्थेच्या पुढाकारामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने हा निर्णय घेतला. यामुळे आता बेडूक पकडणे व वापरणे हा कायदेशीर गुन्हा मानला जातो.
सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व
बेडकांना पावसाळ्याचा राजा मानले जाते. अनेक ठिकाणी पाऊस न झाल्यास त्यांच्या ‘लग्न’ लावण्याची पारंपरिक प्रथा आहे. महाराष्ट्र व इतर राज्यातील काही भागांमध्ये शेतकरी बेडकांची पूजा करून पावसासाठी साकडे घालतात. याशिवाय, संस्कृत पुराणांतील ‘मांडूकसुक्त’ यामधूनही बेडकांचे महत्त्व अधोरेखित होते.
बेडूक ही नैसर्गिक अन्नसाखळीतील महत्त्वाची कडी आहे.यंदाचा मान्सूनपूर्व पाऊस त्यांच्या पुनरुत्थानासाठी उपयुक्त ठरला आहे. त्यांच्या संख्येत वाढ होणे हे पर्यावरणातील समतोलासाठी आवश्यक आहे.
फणिंद्र वाडकर
वन्यजिव संरक्षक,अमरावती*
