
कारण यावेळेस लाईनवर अनेक जीव धोका पत्कारून काम करत असतात
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
आपण घरी सुरक्षितपणे बसलेलो असतो… बाहेर मुसळधार पाऊस कोसळत असतो, वादळी वारा सुटलेला असतो किंवा उन्हाने जग जळत असतं. आपण दारं-खिडक्या बंद करतो आणि आरामात बसतो. यादरम्यान जर का वीज पुरवठा खंडित झाला,तर नाही ते आपण बोलून जातो!, परंतू हा विचार केला का ?,अशा वेळेला महावितरणचा लाईनमन जीव धोक्यात घालून खंडित झालेला वीज पुरवठा सुरू करण्यासाठी काम करत असतो,म्हणूनच रात्री – बेरात्री खंडित झालेला वीज पुरवठाही सुरू होतो.
*अंधार पडल्यानंतर त्यांची परीक्षा सुरू होते*
वीज गेली की लगेच आपण अस्वस्थ होतो. “अरे, लाईट गेली! केव्हा येणार आता?” असे उद्गार आपोआप तोंडून निघतात. पण या क्षणी, हजारो कुटुंबांमध्ये काळजी आणि चिंता सुरू होते. कंट्रोल रूममधून कॉल येतो — “लाईन सुरू करा!” आणि क्षणाचाही विलंब न करता, कर्मचारी बाहेर पडतो. वादळ असो, पाऊस असो, किंवा कडक ऊन, तो झपाट्याने कामाला लागतो. तो एक प्रिय पती, प्रेमळ वडील, सुसंस्कृत मुलगा, अथवा जबाबदार भाऊ असतो. त्याच्या कुटुंबीयांना त्याची काळजी वाटते. त्यांची मुलं दिव्याजवळ प्रार्थना करतात, “बाबांना काही होऊ नये.” पत्नी मनातल्या मनात म्हणते, “देवा, काही वाईट घडू नये.”
*एका मुलीचे भावनिक आवाहन*
वीज क्षेत्र हे अत्यंत धोक्याचे आहे,चूकीला येथे माफी नाही.त्यामुळे”कृपया वीज गेल्यावर ओरडू नका, रागावू नका. आमचे वडील, काका, भाऊ ह्याच लाईनवर काम करत आहेत. थोडीशी चूक त्यांचा जीव घेऊ शकते!”
हे वाक्य आपल्याला अंतःकरणाला भिडते. एका मुलीच्या डोळ्यातील भीती हे सांगते — “बाबा शेवटचं ट्रान्सफॉर्मरकडे गेले, परत आलेत का?” आई दर पाच मिनिटांनी विचारते — “फोन आला का? काही विद्युत शॉक वगैरे नाही ना?”
*दररोज लाईनमन जीव धोक्यात घालून विजेची सेवा सुरळीत करतात*
कतर्व्य बजावताना धोका पत्करणारे हात
एका कर्मचाऱ्याच्या पत्नीचे म्हणणे आहे
“जेव्हा पाऊस पडतो, वारा सुटतो, मी देवाजवळ प्रार्थना करते. फोन उशीर झाला की काळजी वाढते.”
एक वरिष्ठ लाईनमन म्हणतो, “सर्वात मोठा धोका म्हणजे पाऊस. जमीन ओलसर होते, खांब ओले होतात, विद्युत प्रवाह पसरतो. फिसळण्याचा धोका वाढतो. वरून कंट्रोल रूमचा फोन असतो की ‘लाईन सुरू करा’.” पण लोकांना हे माहीत नसते की, या लोकांचे प्राण पणाला लागलेले असतात.
*पुढच्यावेळी लाईट गेल्यावर…*
ग्राहकासाठी वीज म्हणजे फक्त एक बटण दाबणं. पण त्या बटणामागे कुणाचा तरी जीव धोक्यात असतो.वादळात तुटलेली लाईन सांधणं, खांब चढणं, पाण्यातून चालत कामाला जाणं, हे सगळं जीवघेणं असतं. पण हे सगळं करून ते पुन्हा लाईट देतात.
म्हणून पुढच्या वेळी लाईट गेल्यावर त्रासून जाऊ नका. कुणीतरी तुमच्यासाठी धोकादायक काम करतंय, ही जाणीव ठेवा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्या कुटुंबासाठी शुभेच्छा द्या. त्यांच्या कार्याचा सन्मान करा, कारण ते खरंच खूप मोठं आणि आव्हानात्मक काम करत आहेत.
1 no 👍