
३५ एकरवर अतोनात नुकसान, शासनाकडे मदतीची मागणी
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
तालुक्यातील वडुरा या गावात अलीकडे झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी मेहनतीने पेरलेला तीळ पीक अतिवृष्टीमुळे पूर्णतः नष्ट झाला असून, या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.वडुरा येथील शेतकरी गणेश भाऊराव रिठे, अतुल लोंढे, राजू चौकट, विठ्ठलराव शेटे, मनोहरराव ढेरे, पंकज मार्गे, जगतराव लोंढे, वैभव वडुळकर, गजानन धानोरकर, रघुनाथ वरुडकर, गजानन ढेरे, मुकेश ढेरे व दामू बोबडे या शेतकऱ्यांनी मिळून सुमारे ३५ एकर क्षेत्रात उन्हाळी तिळाची पेरणी केली होती.प्रत्येक एकरमागे सुमारे २०,००० रुपयांचा खर्च पेरणीपासून कापणीपर्यंत झाला होता. मात्र, अलीकडील वादळी पावसामुळे पीक जमिनीवर आडवे पडले असून, उत्पादन शून्यावर आले आहे. त्यामुळे एकूण खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे.या नुकसानीमुळे गावातील अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, कर्जबाजारीपणाच्या गर्तेत शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांनी शासन दरबारी विनंती केली आहे की, तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून त्यांना काहीसा दिलासा मिळू शकेल.शासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी वडुरा येथील शेतकरी करीत आहेत.