
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शासकीय वाहनांसोबतच नागरिकांची दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर उभी करण्यात येत असल्यामुळे पायी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयात प्रवेश करताना मोठी कसरत करावी लागत आहे. इमारतीच्या आजूबाजूला वाहनांची रांग लागत असल्याने कार्यालयाच्या आत जाणारा प्रवेशमार्ग अडवला जात आहे.
विशेष म्हणजे, या कार्यालयासाठी दोन स्वतंत्र वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, ते रिकामे असून कोणताही नागरिक त्याचा वापर करत नाही. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, अशा चुकीच्या ठिकाणी वाहने उभी करणाऱ्या नागरिकांवर कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे वाहने अयोग्य ठिकाणी उभी करत आहेत. यामुळे कार्यालयात येणाऱ्या वृद्ध, महिला व अपंग नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीकडे तहसीलदार यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी याकडे गांभीर्याने पाहून कठोर पावले उचलल्यासच नागरिकांचा त्रास कमी होईल.अश्या प्रतिक्रिया या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
प्रतिक्रिया
या वाहतूक अव्यवस्थेमुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. वाहनतळ असतानाही त्याचा वापर न होणे ही दुर्लक्षाची बाब आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी वाहन उभी करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. तहसीलदार यांनी याकडे जातीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, या वाहनाच्या रांगा मुळे कार्यालयाच्या आतमध्ये जायला सुद्धा जागा नसते त्यामुळे पायी येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
सूरज काकडे
नागरिक, फुबगाव, ता.नांदगाव खंडेश्वर