
केंद्र सरकार कडे खा.बळवंत वानखेडे यांनी मागणी
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण शेतकऱ्याचा मुख्य आधार असलेली सेवा सहकारी सोसायटी बाबत शासन स्तरावर जाचक अटी थोपविण्याचे कटकारस्थान सुरु झाले आहे. परिणामी अशा निर्णयामुळे सेवा सहकारी पतसंस्था व ग्रामीण अर्थकारण संकटामध्ये येईल. याबाबत खा. बळवंत वानखडे यांनी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेत या महत्वपूर्ण विषयावर चर्चा केली. यावेळी खा. बळवंत वानखडे यांनी शासनाच्या धोरणाबाबत चिंता व्यक्त करीत चुकीच्या निर्णयावर निर्बंध ठेवावे असे निवेदन सुद्धा दिले.खा. बळवंत वानखडे यांनी अर्थमंत्री सीतारामन यांना सांगितले की, ग्रामीण शेतकऱ्याचा मुख्य आधार व कर्जाचे सरोत सेवा सहकारी सोसायटी असून जिल्हा मध्यवर्ती बँक एकमेव कर्ज पुरवठा करते. या कर्जाच्या भरोशावर सेवा सहकारी सोसायटी या शेतकऱ्यांना कर्ज देतात. मात्र शासनाचे चुकीच्या धोरण आणि घोषणेमुळे ग्रामीण भागातील सहकारी सोसायटी चा एनपीए अधिक वाढला आहे. परिणामी सेवा सहकारी सोसायटी मोडकळीस निघाल्या आहेत. या सोसायट्यांना आधार देण्याऐवजी त्यांना पॅन कार्ड सक्तीचे करून त्यांच्याकडून इन्कम टॅक्स आयकर वसूल करण्याचा घाट सरकारच्या विचाराधीन आहे.कृषी प्रधान व्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण असणाऱ्या या सेवा सहकारी सोसायटीवर अशा निर्णयांचा अतिरिक्त बोजा लागू नये, त्याकडून इन्कम टॅक्स वसूल करू नये अशी मागणी खा. बळवंत वानखडे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन निवेदन दिले. हे निवेदन देताना खासदार बळवंत वानखडे ,डॉ. कल्याण काळे , डॉ. शिवाजी कालगे, प्रतिमा धानोरकर, वर्षा गायकवाड आणि डॉ. शोभा बच्छाव उपस्थित होते.