
हजारो ग्राहक त्रस्त,ऑनलाईन व्यवहार,शिक्षण,व्यवसाय ठप्प
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
आधुनिक युगात मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा ही जीवनावश्यक गरज बनली आहे. शिक्षण,बँकिंग,आरोग्य,व्यवसाय, शासकीय योजनांचा लाभ घेणे, डिजिटल व्यवहार हे सर्व आज मोबाइल नेटवर्कवर अवलंबून आहे.मात्र नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील Jio ग्राहकांना गेल्या अनेक महिन्यांपासून नेटवर्क अभावामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हजारो ग्राहक असतानाही Jio कंपनीकडून पुरेश्या सेवा देण्यात अपयश येत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विशेषतः नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये आणि तालुक्यातील ग्रामीण भागात भागामध्ये Jio नेटवर्क अत्यंत स्लो राहत असल्याने अनेक ठिकाणी कॉल लावता येत नाही, तर इंटरनेट स्पीड इतका मंद आहे की, एखादी साधी वेबसाईट सुद्धा उघडत नाही. नागरिक महिन्याला ₹300 ते ₹899 पर्यंतचे रिचार्ज करूनही त्यांच्या मोबाईलमध्ये नेटवर्कच राहत नाही. विशेष म्हणजे Jio द्वारे दिला जाणारा दररोजचा २ जीबी डाटा नेटवर्कअभावी वापरातच येत नाही आणि तो वाया जातो.परिणामी ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात दररोज आर्थिक नुकसान होत आहे आणि महत्वाची बाब म्हणजे कंपनीकडून याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे.आणि कंपनीकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण,शेतकऱ्यांचे ऑनलाईन नोंदणी व अनुदानाचे कामकाज, व्यापाऱ्यांचे ऑनलाईन व्यवहार, महिला बचतगटांची UPI व्यवहार व्यवस्था आणि पत्रकारांना वृत्त्तपत्रांना बातम्या पाठविताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे हे सर्व कामे पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत.
विशेषतः महिलांना आणि विद्यार्थ्यांना यामुळे मोठा फटका बसत आहे. अनेकवेळा अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना तालुक्याच्या मुख्यालयात किंवा शहरात जावे लागते, ही बाब अतिशय गंभीर आणि अन्यायकारक आहे.ग्राहकांनी अनेक वेळा Jio मोबाईल वरून ग्राहक सेवा केंद्रावर तक्रारी केल्या. मात्र त्या केवळ कागदावरच राहतात. कॉल लावण्याचा प्रयत्न केला असता तासन् तास ग्राहक सेवा केंद्रावर कॉल लागत नाही. मिळणारी उत्तरं ठरलेली असतात “काम सुरू आहे”, “लवकरच नेटवर्क सुधारेल”, पण प्रत्यक्षात कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक व व्यापाऱ्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून, लवकरात लवकर Jio नेटवर्कची सुधारणा झाली नाही तर एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत Jio कंपनीविरोधात निवेदन देण्यात येणार आहे. याशिवाय ग्राहकांनी आपल्या Jio सिमचे ‘पोर्टिंग’ इतर नेटवर्कमध्ये करण्यासही सुरुवात केली आहे.
Jio कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. ग्राहक हा या यंत्रणेचा कणा आहे. नेटवर्क देण्यात अपयशी ठरणाऱ्या कंपनीविरुद्ध ग्राहकांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची वेळ आली आहे.नागरिकांची मागणी आहे की “जेथे सेवा नाही,तेथे वसुली कशासाठी? असा संतप्त सवाल जिओच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्राहकाकडून कंपनीला उपस्थित केल्या जात आहे.
👍