
तुर,कपाशी व सोयाबीन लागवडीसाठी तयारी पूर्ण
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून तालुक्यांतील शेतकरी आता पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. शेतांमध्ये जांभूळ वाई करून, रोटावेटर व ट्रॅक्टरच्या साह्याने बेड मेकरने बेड पाडून तुर लागवडीसाठी जमिनी पूर्णतः करण्यात आलेल्या आहेत. कापूस लागवडीसाठीही सऱ्या तयार करून ठेवण्यात आल्या असून पाऊस सुरु झाला की तात्काळ तुर,कपाशी व सोयाबीन या पिकांची पेरणी केली जाणार आहे.मागील वर्षी अतिवृष्टीमुळे तुरीचे पीक जळाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी नवे धोरण स्वीकारले आहे. त्यांनी बेडवर तुर लागवड करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे अति पावसामुळे सुद्धा तुरीचे नुकसान होणार नाही असा विश्वास शेतकऱ्यांना वाटतो आहे.
यंदा सोयाबीनच्या मागील वर्षीच्या कमी दरामुळे काही शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीकडे कल दर्शवला आहे. मात्र कपाशी लागवडीसाठी खुरपणीचा जास्त खर्च येत असल्याने “राउंडअप” सहनशील बीटी कपाशी पेरण्याचा निर्णय अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. ही बीटी कपाशी अजूनही शासनमान्यता प्राप्त नसल्याने ती बाजारात बेकायदेशीरपणे विकली जात आहे. अधिक पैसे मोजून शेतकरी ही बियाणे विकत घेत आहेत आणी त्याची चोरून लागवड केली जात आहे.
तसेच अजित-५ हे लवकर येणारे कपाशीचे वाण असल्याने त्यालाही शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. मात्र बाजारात हे बियाणे उपलब्ध नसल्याने त्याच्या MRP पेक्षा अधिक दराने खरेदी करावी लागत असून त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरु झालेला आहे. शेतकरी लवकर येणाऱ्या कपाशीला पसंती देत आहेत कारण उशिरा येणाऱ्या कपाशी पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो.
सध्याच्या स्थितीत शेतकरी पूर्णतः तयारीत असून, केवळ पावसाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. पावसाळा सुरळीत आणि वेळेवर सुरु झाला तर यंदा तालुक्यात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा केली जात आहे.
👍