
ȳनांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नुकत्याच झालेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. उन्हाळी हंगामातील मुख्य पिकांसह फळपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. नुकसानीचा आकडा अंतिम अहवालानंतर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात यावर्षी उन्हाळी हंगामात कांद्याची २६२ हेक्टर, भुईमुगाची ९२ हेक्टर, तिळाची सुमारे ४०० हेक्टर आणि मुगाची सुमारे २० हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. मात्र, अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानामुळे आजपर्यंत कांद्याचे १७९ हेक्टर, भुईमुगाचे ४० हेक्टर, तिळाचे ५७ हेक्टर आणि मुगाचे ७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
फळपिकांनाही या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये संत्रा १८ हेक्टर, लिंबू ४२ हेक्टर, पपई ०.०४ हेक्टर आणि केळी २.५० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि सहायक कृषी अधिकारी यांच्यामार्फत सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर नुकसानीची खरी तीव्रता स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नुकसानीचे क्षेत्र आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.ॲग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य, अन्यथा मदतीपासून वंचित राहण्याची शक्यताशासनाच्या नवीन धोरणानुसार, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ‘ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी’साठी नोंदणी केलेली नाही, त्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांकडे शेतजमीन आहे, त्या सर्वांनी तात्काळ आपल्या नावाची ॲग्रीस्टॅक प्रणालीमध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे. यामुळे भविष्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे तसेच अशा आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवणे सुलभ होणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, नांदगाव खंडेश्वर यांच्यामार्फत करण्यात येत आहे.