काया मातीत उगलं, कास्तकाराचं धन…
उघडले बोंडानं डोये हरकलं साऱ्याचं मन…!
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
नव्या पिढीला वऱ्हाडी बोलीभाषेतील साहित्याची गोडी लागावी आणि लोकसंस्कृतीचा परिचय व्हावा या उद्देशाने, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एन.ए.पी.), बी.ए. द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्रासाठी मूळच्या पातूर येथील आणि सध्या परतवाडा येथे वास्तव्यास असणाऱ्या प्रा. वृषाली विजय देवकर यांच्या ‘शितादई’ या लोकप्रिय वऱ्हाडी कवितेचा समावेश करण्यात आला आहे.प्रा.वृषाली देवकर या सध्या अचलपूर येथील स्व. छगनलाल मुलजीभाई कढी (सी. एम. कढी) महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्रात कार्यरत आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात एम.ए., डी.एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या त्या स्त्रीवादी साहित्यावर संशोधन करत आहेत. केवळ अध्यापनच नव्हे, तर साहित्य क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी ‘तरुण भारत’मध्ये ‘माझे राजेशाही’ या सदराखाली केलेले लेखन आणि आकाशवाणीसह दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील ‘हास्य पंचमी’, ‘हास्यरंग’ व ‘अनवट स्वाद’ यांसारख्या कार्यक्रमातून विदर्भाच्या वऱ्हाडी संस्कृतीचे समर्थपणे नेतृत्व केले आहे. त्यांच्या या साहित्यिक प्रवासाची दखल घेत त्यांना वऱ्हाडरत्न, युवाभूषण, सखी सम्राज्ञी आणि कवीरत्न यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘वऱ्हाडी कविता’ या संपादनांतर्गत समाविष्ट करण्यात आलेली ‘शितादई’ ही कविता पश्चिम विदर्भातील शेती, कष्टकरी वर्ग आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव अत्यंत प्रभावीपणे मांडते. कापूस (पांढरे सोने) आणि काळ्या मातीशी असलेले नाते या कवितेतून अधोरेखित होते. अभ्यासक्रमातील या समावेशाबद्दल प्रा. वृषाली देवकर यांनी आनंद व्यक्त केला असून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, मराठी अभ्यास मंडळ, संपादक मंडळ तसेच प्राचार्य डॉ. काशीनाथ बऱ्हाटे, डॉ. अशोक इंगळे आणि डॉ. श्रीकृष्ण पद्मने यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे वऱ्हाडी बोलीचा गोडवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.
