
रस्त्याने पायी चालणे झाले कठीण; अपघाताची वाढली शक्यता.
मनोहर बगळे यांनी दिला आंदोलनाचा इशारा.
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गटग्राम पंचायत खानापूर अंतर्गत येणाऱ्या गोळेगाव, खानापूर, मलकापूर आणि जगतपूर या चारही गावांमध्ये प्रामुख्याने आदिवासी व मागासवर्गीय सामान्य शेतकरी व शेतमजूर राहत असून, मागील दहा वर्षांपासून मलकापूर ते गोळेगाव दरम्यानचा सुमारे ३ किलोमीटर रस्ता अतिशय खराब अवस्थेत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थी आंदोलन छेडतील, असा इशारा गट ग्राम पंचायत सदस्य मनोहरराव बगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे या परिसरातील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि विद्यार्थी वर्ग यांना या रस्त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाहू महाराज विद्यालय, सालोड येथे शिक्षण घेण्यासाठी या चारही गावांतील सुमारे ९० विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दररोज प्रवास करतात. मात्र रस्त्याची अत्यंत खराब अवस्था, खड्डे व चिखलामुळे मोटरसायकल किंवा सायकल चालवणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. बस सेवा देखील दररोज उपलब्ध नसून एक दिवस आडच धावत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय वाढली आहे.
या रस्त्यामुळे अनेक वेळा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वेळा एखाद्या मजुराला अपघात झाल्यास दवाखान्यात पोहोचवण्यासाठी तीन किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी तब्बल एक तास लागतो, परिणामी काहींना जीव गमवावा लागला आहे. शेतमाल वाहतूक करताना देखील शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो.या रस्त्याने पायी चालत जाणे सुद्धा कठीण झाले असून रस्त्याचे सर्व दगड निघालेले असल्याने या रस्त्यावर अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे या रस्त्याबाबत ग्रामपंचायतीकडून वारंवार ठराव सादर करण्यात आले, निवेदने दिली, तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्षच केले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून जर लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीची कार्यवाही करण्यात आली नाही, तर संपूर्ण गावकरी, शेतकरी, शेतमजूर, महिला आणि विद्यार्थी यांच्यातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनोहरराव बगळे यानी दिला आहे.