नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
यापुर्वी अल्टिमेटमनंतरही काम सुरू न झाल्याने, नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चातून रपट्याच्या डागडुगीचे काम हाती घेऊन प्रशासनाच्या संवेदनशून्यतेवर कडक ओढले आहेत.
नेमके प्रकरण काय?
पाच महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे हनुमान मंदिर परिसरातील नालीवरील सिमेंट रपटा मोठ्या प्रमाणात खचला होता. यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पाळीव जनावरांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला होता. स्थानिक नागरिकांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी नगर पंचायतीला लेखी निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, पाच महिने उलटूनही प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.

प्रशासनाचा ‘राक्षसी’ विलंब; आंदोलनाचा दिला होता इशारा
नगरसेविका प्रांजली गुल्हाने यांनी यापूर्वीच प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता की, जर काम सुरू झाले नाही तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी त्यांनी आंदोलनापूर्वीच लोकहिताचा विचार करत स्वतः पुढाकार घेतला.

“प्रशासनाच्या चुकीची शिक्षा नागरिकांना का?”
यावेळी बोलताना सौ. प्रांजली गुल्हाने म्हणाल्या, “प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना जनतेच्या जिवाची पर्वा नाही, हे दुर्दैवी आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार होते का? नागरिकांची सुरक्षा ही माझी प्राथमिकता आहे, म्हणूनच मी स्वतः पुढाकार घेऊन ही डागडुगी करत आहे. मात्र, प्रशासनाच्या या हलगर्जीपणाचा आम्ही तीव्र निषेध करतो.”नगरसेविकेच्या या धाडसी निर्णयाचे परिसरात कौतुक होत असून, “लोकप्रतिनिधी असावा तर असा,” अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. आता तरी नगर पंचायत प्रशासन जागे होऊन प्रभागातील इतर प्रलंबित कामे मार्गी लावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
