
प्रवाशांना उन्हाची झळ;पशुपक्ष्याची भटकंती
सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता चव्हाट्यावर
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा ते यवतमाळ दरम्यानच्या रस्त्यावरून शिगणापुर (ता. नांदगाव खंडेश्वर) व रेणुकापुर (ता. नेर परर्सोपंत) या गावांच्या परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना आजही उन्हाच्या झळा सहन करत प्रवास करावा लागत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सावली देणाऱ्या झाडांचा अभाव.
या मार्गावरून दररोज शेकडो वाहने आणि हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा झाडांची वानवा असून, अपघात झाल्यास जखमींना सावलीत बसवण्यास किंवा थांबवण्यास एकही झाड उपलब्ध नाही. परिणामी उन्हात थांबणे हे त्यांच्या जीवावर बेतण्यासारखे ठरत आहे.
पूर्वीची हिरवळ कुठे गेली ?
कधी काळी या रस्त्याच्या कडेला लावलेली विविध प्रकारची झाडे प्रवाशांना दिलासा देत असत. संपूर्ण मार्ग हिरवळीत न्हालेला असायचा. पण आता ही हिरवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी कारभारामुळे नाहीशी झाल्याचे चित्र आहे. झाडे वाळून गेली, काही ठिकाणी तोडण्यात आली, तर काही ठिकाणी नव्याने लागवडच झालेली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारीपासून दूर
या संपूर्ण मार्गाचे देखभाल व व्यवस्थापन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. तरीही विभागाचे अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. वृक्षलागवड, देखभाल, झाडांचे संरक्षण आणि हरित पट्ट्याची निर्मिती याबाबतीत प्रशासनाकडून काहीच ठोस पावले उचलली जात नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे “हे अधिकारी करतात तरी काय?” असा सवाल सामान्य नागरिकांमधून उपस्थित होतो.
सावलीसाठी लढा उभारण्याची गरज.?
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडांची गरज अत्यंत आवश्यक आहे. फक्त वृक्षलागवड करून थांबणे नव्हे, तर त्यांची योग्य देखभाल आणि संवर्धन हे देखील महत्त्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाने, ग्रामपंचायतींनी आणि पर्यावरणप्रेमी संस्थांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
प्रतिक्रिया
अमरावती – यवतमाळ मार्गावरील सावलीचा अभाव ही केवळ प्रवाश्यांची गैरसोय नाही, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाची साक्ष आहे.या रस्त्याने दुपारी प्रवास करणे म्हणजे अंगाची लाही लाही होते.रस्त्यावर एखादा अपघात घडल्यास जखमी व्यकतीस सावली मिळण्याची सोय नाही. पूर्वी झाडापासून सावली मिळायची आता मात्र उन्हात उभ राहावं लागत.यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.या रस्त्याला पुन्हा हिरवळ देण्यासाठी आता ठोस कृतीची वेळ आली आहे. याकडे सा.बा.विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे.
प्रा.डॉ.नितीन टाले
पर्यावरण मित्र,नांदगाव खंडेश्वर