अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
स्व.अंबादास कृष्णाजी वैद्य, ज्यांना जनमानसात प्रेमाने ‘दादाजी’ म्हणून ओळखले जाते; ते शारीरिक शिक्षण क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि कट्टर राष्ट्रप्रेमी होते. त्यांच्या जीवनाची सार्थकता ही महाराष्ट्रातील अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (HVPM) या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त संस्थेच्या स्थापनेत पूर्णत्वास आली. दि. ९ सप्टेंबर ही दादाजींची पुण्यतिथी, अंबादासपंतांच्या या स्मृतिदिनी त्यांच्या अथांग कार्याचा आढावा घेणारा हा लेख.
इतिहासाच्या पाऊलखुणा
अंबादास कृष्णराव गोरे हे त्यांचे मूळ नाव. गोरे कुटुंब अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूरचे. अंबादासपंतांचे वडील श्री. कृष्णराव रामचंद्र गोरे यांची जुन्या अमरावती शहरातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळील नगरपालिका शाळा क्रमांक १ च्या प्राचार्यपदी बदली झाली. त्यावेळी ते बेलापूरकर म्हणून ओळखले जात होते. कृष्णराव हे जुन्या काळातील आजार आणि औषधांचे जाणकार होते म्हणून लोक त्यांना ‘वैद्य’ म्हणजेच डॉक्टर म्हणून संबोधत असत. कालांतराने वैद्य हेच संबोधन त्यांचे आडनाव म्हणून रूढ झाले.
राष्ट्रप्रेमाचे बाळकडू
अंबादासपंतांचा जन्म ३० ऑगस्ट १९०२ रोजी झाला. लहानपणापासूनच अंबादासपंतांना जिम्नॅस्टिक्स आणि विविध प्रकारच्या शारीरिक व्यायामांची गोडी होती. कौटुंबिक वारसा बघता ही आवड केवळ वैयक्तिक फायद्यासाठी नसून त्यांच्या राष्ट्रप्रेमी श्रद्धेचे द्योतक होते. ते आणि त्यांचे भाऊ अनंतराव हे त्यांच्या काळातील स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक, विशेषतः वीर वामनराव जोशी आणि चाफेकर बंधूंच्या विचारसरणीने प्रेरित होते. त्यांची शारीरिक संस्कृतीची कल्पना ही केवळ मजबूत शरीरयष्टी निर्माण करण्यापुरती मर्यादित नव्हती तर त्यांनी या माध्यमातून स्वतंत्र भारताचे पुनरुत्थान करण्याचे उदात्त ध्येय बाळगले होते.अंबादासपंतांनी त्यांचे भाऊ अनंतराव आणि सहकाऱ्यांसह १९१४ मध्ये एका लहान व्यायामशाळेची स्थापना केली, ज्याला त्यांनी “हनुमान क्लब” असे नाव दिले. शक्ती, आरोग्य आणि चारित्र्याचे मूर्त स्वरूप असलेल्या हनुमान देवतेचा संदर्भ देणारे हे नावच जणू त्यांच्या मूळ तत्वज्ञानाचे प्रतिबिंब होते. या व्यायामशाळेच्या माध्यमातून त्यांना दोन गोष्टी अपेक्षित होत्या. एक म्हणजे शारीरिक शिक्षण चळवळीला राष्ट्रीय पुनर्जागरणाशी जोडणे आणि दुसरे म्हणजे पारंपारिक भारतीय शारीरिक व्यायामांना अधिक सुलभ आणि प्रभावी बनवण्यासाठी आधुनिकीकरणाची जोड देऊन शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचे मानकीकरण करणे.
एचव्हीपीएमची स्थापना आणि विकास
ब्रिटिश राजवटीत तरुणांना गुप्तपणे प्रशिक्षित करून स्वातंत्र्यलढ्यासाठी सक्षम बनवणारी राष्ट्रप्रेमी संस्था तयार करण्याची धुरा हनुमान क्लबने समर्थपणे उचलली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीला जसजशी गती मिळाली तसतशी व्यायामशाळेनेही गती घेतली. शारीरिक शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अंबादासपंतांच्या नेतृत्वात संस्थेचे भारतभर प्रात्यक्षिक दौरे होत असत. याच कल्पनेतून १९२३ साली वार्षिकोत्सवाची सुरुवात झाली आणि १९३० सालापासून याचेच रूपांतर दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या सामूहिक कवायतींमध्ये झाले. ही सामूहिक कवायत आजतागायत अविरतपणे दसऱ्याच्या दिवशी सुरू आहे. सन १९२४ मध्ये, बदलत्या राजकीय वातावरणासह हनुमान क्लबचे नामकरण “श्री हनुमान व्यायाम शाळा” असे करण्यात आले. यामुळे व्यायामशाळेच्या उपक्रमांना खुले व्यासपीठ उपलब्ध झाले. एका लहान, स्थानिक व्यायामशाळेपासून मोठ्या देशव्यापी संस्थेत उत्क्रांत होण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल होते. याच वर्षी अंबादासपंतांनी भारतीय पारंपरिक व्यायाम प्रकार आणि पाश्चिमात्य विज्ञान यांच्या संयोगातून भारतातील एकमेवाद्वितीय असे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केले. यामध्ये व्यायाम प्रवेश, व्यायाम पटू, व्यायाम विशारद आणि व्यायाम पारंगत अशा पदव्यांचा समावेश होता.अशा प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करणे हाच विचार अंबादासपंतांचा भविष्यवेधी दृष्टिकोन दर्शवतो. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून भारतीय तरुणांना पारंपरिक व्यायाम प्रकारांसोबतच आवश्यक ते आधुनिक ज्ञान मिळावे या हेतूने त्यांनी विशेष प्रयत्न केले. ज्या काळात दळणवळण साधनांच्या कमतरते अभावी भारत भ्रमण करणे सहज शक्य नव्हते, त्या काळात त्यांनी आपल्या सोबतचे कार्यकर्ते आधुनिक ज्ञान मिळवण्यासाठी विविध देशांमध्ये पाठवले. यामध्ये १९२८ साली श्री.लक्ष्मणराव कोकर्डेकर यांना शारीरिक शिक्षणाचे आधुनिक प्रशिक्षण घेण्यासाठी बर्लिन (जर्मनी), १९३० साली डॉ. ज्ञानेश्वर देशपांडे यांना जुजुत्सु अर्थात ज्युडोचे प्रशिक्षण घेण्यासाठी कोडोकान (जपान), १९३१ साली श्री. रघुनाथराव खाणीवाले यांना भारतीय धनुर्विद्येचा प्रचार करण्यासोबतच ज्युडोचे प्रशिक्षण घेण्यासाठी जपान आणि १९३४ साली श्री. मुकुंदराव कागलकर आणि श्री. गोपाळराव काळे यांना आंतरराष्ट्रीय स्काऊट महोत्सवात सहभागी होण्यासाठी बुडापेस्ट (हंगेरी) येथे पाठवण्यात आले. यापैकी श्री. रघुनाथराव खाणीवाले यांनी भारतामध्ये ज्युडो या क्रीडा प्रकाराची सुरुवात केली तर श्री. मुकुंदराव कागलकर आणि श्री. गोपाळराव काळे यांनी भारतामध्ये स्काऊट अँड गाईडच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य केले. आताच्या मोबाईल आणि ईमेलच्या काळात आपल्याला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अगदी काही सेकंदात संपर्क साधता येतो, पण केवळ पत्रव्यवहाराच्या जोरावर अंबादासपंतांनी आंतरराष्ट्रीय संपर्काचे शिवधनुष्य लिलया पेलले आणि भारतीय पारंपरिक व्यायाम प्रकारांना आधुनिक विज्ञानाची जोड दिली.१९२८ साली शासन दरबारी या संस्थेची औपचारिक नोंदणी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (HVPM) म्हणून झाली. अंबादासपंत हे एक स्वयंप्रेरित नवोन्मेषक होते आणि म्हणूनच शारीरिक व्यायामाचे नवनवीन प्रकार शोधून त्यांनी अंमलात आणले. “गडगफरी” आणि “लाठी-काठी” (काठी लढाई) सारख्या पारंपारिक भारतीय प्रकारांमध्ये त्यांनी विलक्षण कौशल्य प्राप्त केले होते. स्वतःच्या शरीरावरून भरलेल्या बैलगाडीला जाऊ देण्यासारखे त्यांचे शारीरिक पराक्रम विस्मयकारक होते आणि त्यामुळे त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. ते सातत्याने नाविन्यपूर्ण कल्पना वापरून प्रशिक्षण देत असत, ज्यामुळे खेळाडूंवर शारीरिकदृष्ट्या धष्टपुष्ट आणि मानसिकदृष्ट्या कणखरतेचे संस्कार होत असत. याच दरम्यान १९३२ साली त्यांनी नागरी संरक्षण दल या स्वतंत्र शाखेची स्थापना केली. या अंतर्गत त्यांनी तरुणांना सामाजिक योगदानाची जाणीव करून देत सामाजिक कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली.
स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हे केवळ शारीरिक उत्कृष्टतेसाठी प्रशिक्षण केंद्र नव्हते; तर ते एक सुरक्षित आश्रयस्थान आणि स्वातंत्र्य चळवळीच्या उपक्रमांचे केंद्र होते. संस्थेचे संस्थापक अंबादासपंत, जे एका अर्थाने स्वतः स्वातंत्र्यसैनिक होते; त्यांनी इतर क्रांतिकारकांचे स्वागत आणि समर्थन केले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांसारख्या प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी या संस्थेला भेट दिली आणि आशीर्वाद दिले. शिवराम राजगुरू आणि डी. एस. देशपांडे यांसारखे दिग्गज संस्थेचे विद्यार्थी होते आणि असे म्हटले जाते की चंद्रशेखर आझाद यांनीही काही दिवस या ठिकाणी आश्रय घेतला होता. स्वातंत्र्य चळवळीशी असलेल्या संबंधामुळे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला एक देशप्रेमी संस्था म्हणून लौकिक प्राप्त झाला.
आंतरराष्ट्रीय मान्यता
अंबादासपंत यांची दूरदृष्टी भारतीय सीमेच्या पलीकडे पसरलेली होती. पारंपारिक भारतीय क्रीडा संस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी १९३६च्या बर्लिन ऑलिम्पिकसाठीच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आणि संघ पाठवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मल्लखांब आणि इतर स्थानिक व्यायाम प्रकारांची चित्तथरारक प्रात्यक्षिके या संघाने सादर केली. या प्रात्यक्षिकांनी प्रभावीत होऊन जर्मन चान्सलर ॲडॉल्फ हिटलर याने श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या या संघाला विशेष उल्लेखनीय बाब म्हणून ऑलिम्पिक पदक बहाल केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, अंबादासपंतांचे हनुमान क्लब स्थापनेचे एक ध्येय साध्य झाले. आता त्यांनी दुसऱ्या ध्येयाला समोर ठेवून पारंपारिक खेळ आणि योगाला प्रोत्साहन देत आयुर्वेदिक औषध, निसर्गोपचार आणि शारीरिक शिक्षणातील शिक्षक प्रशिक्षण यासारख्या क्षेत्रात पदार्पण करून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कार्यात विविधता आणली. काळाची दिशा ओळखत केलेल्या या बदलाने एका छोट्या व्यायामशाळेचे रूपांतर आंतरराष्ट्रीय बहु-विद्याशाखीय संस्थेत झाले आहे.
समर्थ वारसा
आज श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची धुरा त्यांचे सुपुत्र पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हे समर्थपणे सांभाळत आहेत. अंबादासपंत यांना शारीरिक शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी विश्व बलधर्म विद्यापीठ स्थापन करायचे होते. त्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. आज पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था दादाजींचे स्वप्न साकार करण्यासाठी क्रीडा विद्यापीठ होण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत आहे. त्याचेच पहिले पाऊल म्हणून आज संस्थेच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोग आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने स्वायत्त दर्जा बहाल केलेला आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील अभिमत क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी संस्थेला हिरवा कंदील दिला आहे. एवढेच नाही तर पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या नेतृत्वात युनेस्को सारख्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संघटनेने २०१५ साली या संस्थेला आपले मानद सदस्यत्व बहाल केले आहे. आज या संस्थेत शारीरिक शिक्षण महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालय, क्रीडा विद्यालय आणि आदिवासी आश्रम शाळांचा समावेश आहे.शैक्षणिक संस्थांच्या व्यतिरिक्त श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अंतर्गत विविध क्रीडा प्रकारांचे नियमित प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. यामध्ये जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, टेबल टेनिस, नेमबाजी, बास्केटबॉल, जलतरण, कुस्ती, ज्युडो, फुटबॉल, बॅडमिंटन, लॉन टेनिस, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, तायक्वांदो इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. आज या वर्गांच्या माध्यमातून अनेक खेळाडू आपले कौशल्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करत आहेत. विशेष अभिमानाची बाब म्हणजे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आज येथील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक विजेती कामगिरी करत आहेत.
स्फूर्ती, प्रेरणा आणि अभिमान
अंबादासपंत वैद्य हे केवळ एका संस्थेचे संस्थापक नव्हते, तर अमरावती आणि संपूर्ण भारतातील व्यायाम प्रेमींसाठी “स्फूर्ती, प्रेरणा आणि अभिमान” होते. शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक असलेला समग्र दृष्टिकोन आणि वचनबद्धता यांच्या जोरावर राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून त्यांनी स्थापन केलेल्या एका साध्या व्यायामशाळेचे रूपांतर आज आंतरराष्ट्रीय संस्थेत झाले आहे. त्यांचे जीवनकार्य हे आज श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या रूपाने शारीरिक संस्कृतीच्या शक्तीचा भक्कम पुरावा म्हणून उभे आहे. “आगे बढो, सबसे आगे बढो” हा त्यांचा नारा विद्यार्थ्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कायमच अग्रेसर राहण्यासाठी प्रेरणा देत असतो. दि. ९ सप्टेंबर १९८१ रोजी ही महान विभूती अनंतात विलीन झाली. आधुनिक भारतातील पहिले शारीरिक शिक्षण शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करणारे अंबादासपंत वैद्य हे खऱ्या अर्थाने अखिल भारतीय शारीरिक संस्कृतीचे दीपस्तंभ आहेत.
डॉ.निलेश जोशी,
श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,अमरावती

खूप छान लेख लिहिला आहे. सर आपल्या या लेखामुळे आमचे ज्ञानामध्ये आवश्यक भर पडली खूप खूप धन्यवाद सर